आज ३ मे आज बॉलिवूड मधील स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या मा.नर्गिस दत्त यांची पुण्यतिथी.

*आज ३ मे*
*आज बॉलिवूड मधील स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या मा.नर्गिस दत्त यांची पुण्यतिथी.*
जन्म. १ जून १९२९
मा.नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद. १९३५ साली त्यांनी तलाश-ए-हक चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. ज्यावेळी त्या सहा वर्षांच्या होत्या. त्यांना बेबी नर्गिस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. १९४३ साली त्यांनी मोतीलाल यांच्यासमवेत वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपट केला. त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार म्हणून १९३५ मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाने केले तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरूवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. १९४० आणि १९५० च्या दशकात त्या खूप गाजल्या. बरसात, आवारा, अंदाज, श्री ४२०, दीदार,  चोरी चोरी, मदर इंडिया यासारखे चित्रपट केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून मा.नर्गिस यांचा उल्लेख होतो. तेव्हापासून सालापासून ते १९६० च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत मा.नर्गिस यांनी अनेक सिनेमांतून काम केले. त्यातील अनेक त्यांनी सहअभिनेता आणि सिनेनिर्माता राज कपूर यांजबरोबर केले आहेत.
राज कपूर आणि नर्गिस यांची भेट हा खूप वेगळा किस्सा आहे. राज कपूर हे ‘आग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. फेमस स्टुडिओत त्यांना जागा मिळावी म्हणून ते नर्गिस यांच्या आई जद्दनबाई यांना भेटण्यासाठी  मरीन ड्राईव्ह येथील अपार्टमेंटमध्ये गेले. ज्यावेळी त्यांनी डोअरबेल वाजविली, त्यावेळी दरवाजा या जद्दनबाई उघडतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु एक सुंदर मुलगी अर्थात नर्गिस समोर आली. नर्गिसने विचारले कोण आहात आपण? नर्गिसना पाहून ‘आग’ या चित्रपटासाठी आल्याचे राज कपूर विसरून गेले. त्यांनी नर्गिस यांना चित्रपटात घेतले. त्यानंतर त्यांच्यात आकर्षण निर्माण झाले. नर्गिस यांना राज कपूर यांचे लग्न झाल्याचे माहिती होते. आग हा या दोघांचा पहिला चित्रपट. त्यानंतर बरसात (१९४९) या चित्रपटानंतर त्यांच्यातील संबंध आणखी जुळून आले. राज आणि नर्गिस यांनी जवळपास १६ चित्रपट एकत्र केले.  या दोघांची केमिस्ट्री खूपच छान होती. लोक त्यांना चित्रपटाशिवाय एकत्र पाहू इच्छित होते. राज कपूर यांचा करिष्मा अधिकाधिक वाढला होता. या दोघांनी भारतीय चित्रपटातील प्रेम अधिक दृढ केले. चित्रपटातील यांच्या भूमिका लोकांना आपल्याशा वाटायला लागल्या. श्री ४२० हा चित्रपट सुपरहिट झाला. बॉलिवूड चित्रपटातील सर्वात सुंदर रोमँटिक चित्रपटामध्ये याचे नाव घेतले जाते. चोरी चोरी हा त्यांचा राज कपूरसोबतचा शेवटचा चित्रपट. जागते रहो मध्ये त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. राज कपूर यांचे लग्न झाले हे माहिती असतानाही नर्गिस यांना त्यांच्याकडून लग्नाची अपेक्षा होती; मात्र नंतर ती फोल ठरताना दिसू लागली. आपल्या पत्नीला घटस्फोट न देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि मा.नर्गिस सोबतचे आपले नाते संपुष्टात आणले. त्यांनी राज कपूर यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. बॉबी चित्रपटातून राज कपूर यांनी आपल्या प्रेमाची कथा दर्शविली होती.  शेवटी मदर इंडिया या चित्रपटातील आपल्या सहकलाकार मा.सुनील दत्त यांच्याशी लग्न करून मा.नर्गिस यांनी चित्रपट अभिनयातून निवृत्ती घेतली. विवाहानंतर मा.नर्गिस दत्त यांनी मोजक्याच सिनेमांमध्ये कामे केली. त्यानंतर तिने रात और दिन सारख्या चित्रपटांत अपवादाने अभिनय केला. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मदर इंडिया नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा हा चित्रपट. भारतीय महिलेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटाची कथा फारच दमदार होती. म्हणूनच त्याला ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले. या चित्रपटाच्या सेटवर लागलेल्या आगीतून नर्गिस यांना सुनील दत्त यांनी वाचविले. मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. कलाक्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही नर्गीस नियमितपणे आपले योगदान देत असे. सामाजिक जाणिवेचे भान असणारी ती एकमेव अशी संवेदनशील अभिनेत्री होती. पती सुनिल दत्त यांच्या सहयोगाने तिने अजंता आर्ट्स सांस्क्रुतिक मंडळची स्थापना केली. काही आघाडीच्या अभिनेते व गायकांसह देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी या मंडळामार्फत करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. या मार्फत १९७१साली बांगलादेशच्या स्वातंत्र्य युध्दानंतर ढाका येथे प्रथमच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पॅस्टिक सोसायटी ऑफ इंडियाची ती पहिली आश्रयदाता (पॅट्रन) ठरली. नेत्रहिन व विशेष मुलांसाठी नर्गीस कार्यरत होती. या संघटनेतील तिच्या योगदानामुळे ती सामाजिक कार्यकर्ता म्हणुन नावारुपाला आली. समाजसेवा करता यावी यासाठी नर्गीसने नर्सिंगचे प्रशिक्षणही घेतले होते. भारत सरकारमार्फत देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या सिने अभिनेत्री ठरल्या. तर त्यांना पहिल्यांदाच देण्यात आलेल्या राष्ट्रीय सिने पुस्कारांमध्ये रात और दिन या सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय सिने पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आधारित सर्वोत्तकृष्ट सिनेमाला द नर्गिस दत्त अवॉर्ड दिला जातो. त्या राज्यसभेच्या खासदारही होत्या. १९८० साली स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्या पछाडली गेल्या. न्युयॉर्क येथे काहीकाळ त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या निधनानंतर चारच दिवसांनी मुलगा संजय दत्त याचा पदार्पणाचा चित्रपट रॉकी प्रदर्शित झाला. प्रिमियर शोच्या वेळी एक आसन नर्गीससाठी राखीव ठेवण्यात आले होते. हयात असतांनाची तिची समाजकार्याची तळमळ लक्षात घेता नर्गीस यांच्या  मृत्युनंतर नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर  फौडेंशनची स्थापना करण्यात आली. वार्षिक राष्ट्रीय पुरस्कारांमधे राष्ट्रीय एकात्मतेवरील उत्क्रुष्ट चित्रपटाचा पुरस्कार नर्गीस दत्तच्या नावाने सुरु करण्यात आला. बांद्रा येथील एका रस्त्याचे नर्गीस दत्त रोड असे नामकरण करण्यात आलेले आहे. भारतीय टपाल खात्याने नर्गीसच्या प्रतिमेचे टपाल तिकीट काढुन तिच्या कारकिर्दीचा सन्मान केला. तर सन २००१ साली अमिताभ बच्चन यांचेबरोबरच शतकातील अभिनेत्री म्हणुन नर्गीसला मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
*मा.नर्गिस दत्त* यांचे ३ मे १९८१ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. मा. नर्गिस दत्त  यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.नर्गिस दत्त यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=Stm-0e1ZLX4
https://www.youtube.com/watch?v=mX13BFONdyc
https://www.youtube.com/watch?v=vZpJfz6iu5k
https://www.youtube.com/watch?v=GF5ewHO2XqY
https://www.youtube.com/watch?v=3S3EhJRkHs8
https://www.youtube.com/watch?v=2a3LVWTQtyU

Comments

Popular posts from this blog

आज थोर साहित्यिक व गीतकार मा.शांताराम आठवले यांची पुण्यतिथी.

आज ४ मे आज प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक मा.बाबा कदम यांची जयंती.

आज मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा उर्फ मा.ग.दि.माडगूळकर यांची जयंती.