आज ४ मे आज मा. अरुण दाते यांचा वाढदिवस.
*आज मा. अरुण दाते यांचा वाढदिवस.*
जन्म. ४ मे १९३४
इंदूरच्या मा.रामूभैय्या दाते यांचा
दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. रामूभैय्या म्हणजे मा.अरुण दाते यांचे वडील. मा.अरुण दाते इंदूरजवळच्या
धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर
यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज
गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि
संगीताची उत्तम जाण. असे गुण असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे
स्वप्न अरुणने पुढे प्रत्यक्षात आणले. मा.अरुण दाते टेक्सटाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी
मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटत असत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम
गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम
जिव्हाळा, आणि त्यांच्या कलेबद्दल
अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या
वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले
"टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग". घरूनच
असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्सटाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य
नाही. १९५५ पासून मा. अरुण दाते
आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत म्हणजे १९८४ मध्ये अरुण दाते यांनी
स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. १९६२ मध्ये ’शुक्रतारा मंदवारा’ ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली आणि अरुण
दाते यांना त्यानंतर जराही उसंत मिळाली नाही. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत
दिग्दर्शक सतत तीन वर्षे त्यांच्या पाठीस लागले होते."मी हिंदी मुलखातला,माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी,
हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार
नाही" असे म्हणणार्या अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले.
इ.स.२०१०पर्यंत अरुण दाते यांचे ’शुक्रतारा’ या नावाने होणार्या
मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. आणि हे सर्व कार्यक्रम
हाउसफुल्ल होत आले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक
आल्बम आजही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक
या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली असे म्हटले जाते. मा.अरुण दाते यांनी लता
मंगेशकर,आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती या
सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. आपल्या शुक्रतारा या नावाने ते करीत
असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त मुळात स्वत: गायलेली गीतेच सादर करतात.आणि
श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतात. या बाबतीत ते गजाननराव
वाटव्यांचे शिष्य आहेत.मा.अरुण दाते यांनी "शतदा प्रेम करावे" या नावाने
आत्मचरित्र लिहिले आहे. आपल्या समुहातर्फे *मा.अरुण दाते* यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.अरुण दाते यांची काही
गाणी
Comments